सिंधुदुर्ग | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकत्र पाहून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार टोलेबाजी केली.
यावेळी चारोळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपची पुन्हा युती व्हावी, अशी इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. रामदास आठवले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ही कविता म्हटली. ‘याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे’. चिपी विमानतळाच्या उद्घटनासाठी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले आहेत.
नारायण राणे यांनी मला अगोदरच सांगितले आहे की, माझे मुख्यमंत्र्यांशी कोणतेही वैर नाही. उद्धव ठाकरे यांनीही नारायण राणे यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मीदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी उजाळा दिला. चिपी विमानतळासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.