मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलन करणार आहेत. तर, मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
बुधवारी, ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.
तीन मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळालेल्या नवाब मलिकांचं मंत्रिपद कायम ठेवण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आज मंत्रालयाजवळ महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आंदोलन करणार आहे. तर, शुक्रवापासून जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपकडून आजपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मलिकांना अटक करण्यात प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे मलिक राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.