मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. यावरून आता संपूर्ण विरोधक आघाडी सरकारवर तुटून पडले आहे.
त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या राजकारण – प्रशासनातील गुन्हेगारी तत्व एकत्र येऊन काय करू शकतात? हे आपण पाहतोय असे प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखविले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी कसे वसूल केले जातात याबद्दल खुलासा केलाय पण, आमच्यादृष्टीने ही रक्कमही कमीच आहे. हे मोठं जाळं तयार झालेले आहे. उद्या आम्ही वंचितच्यावतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून हे सभागृह बरखास्त करू नका पण, हे सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार आहोत. हे चोर, खुन्याचं सरकार आहे असा गाम्भीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.