राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर सतत महाईकास आघाडी आणि पवार कुटुंबियांवर आरोप करताना दिसून आले आहेत. त्यातच आता OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणावरुन पत्र पाठवलं आहे.
ते आपल्या पत्रात म्हणतायत की, हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसींना डावलण्यात आल्याचा आरोप पडळकर यांनी आपल्या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असा हल्लाही पडळकरांनी चढवला.
ते आपल्या पत्रात म्हणतायत की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी ,भटके विमुक्त यांच्या हक्क-अधिकारांना कायम डावलण्यात आलंय, पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आलाय. हे शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये, MPSC च्या उत्तीर्ण मागासवर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये, ओबीसींच्या राजकीय आरक्षणबाबत न्यायालयात बाजू मांडतानाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुद्दामहून ‘सेन्सेस डेटा आणि इंपेरिकल डेटा’ यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये, अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आलंय.
महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या आरक्षणा संबंधी, शासकीय लाभ व सवलती संदर्भात आणि ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांचा समग्र अभ्यास करून मंत्रीमंडळाला शिफारस करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीला आता वर्ष होत आलं आहे. बरं या समितीमध्ये कुणी साधी सुधी मंडळी नव्हती. ओबीसींसाठी मोठ्या वल्गना करणारे,ओबीसींवरील प्रेम दाखवत आणाभाका घेणारे आणि प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले महाविकास आघाडी सरकारमधील ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांचा फौज फाटा या उपसमितीमध्ये होता असा आरोप त्यांनी पात्रतून लगावला होता.