केंद्रातून महाविकास आघाडी पडण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव पाडण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पत्र लिहिलं आहे. राऊत यांनी ईडीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ईडीनं माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात कट रचल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पत्रांचा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘सत्यमेव जयते’ म्हटलं आहे.
माझ्या मुलीच्या लग्नात काम देण्यात आलेल्या वेंडर्सना त्रास देण्याचं काम ईडीकडून सुरू आहे. लेकीच्या लग्नात डेकोरेशनचं काम केलेल्या लोकांना ५० लाख रुपये देण्यात आल्याचं वदवून घेण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. पीएमएलए प्रकरणात मला फसवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे, असं राऊत यांनी पत्रात नमूद केलं आहे. या पत्रामुळे राज्यातील नाही तर देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.