मुंबई | पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा बंगल्यावर अर्धा तास चर्चा केली.प्रत्येक राज्यात काँग्रेसला दुर्बल करण्याची भाजपची रणनीती कालच्या निकालावरून दिसते.
काँग्रेसला मानणारा मतदार पद्धतशीरपणे अन्य लहान पक्षांकडे कसा वळेल, ही भाजपची खेळी दिसते. उद्या महाराष्ट्रातही तसेच झाले तर एकूणच महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो, या मुद्यावर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. कालच्या निकालानंतर विशेषत: शिवसेनेचे आमदार अधिक अस्वस्थ असल्याचे मानले जाते. त्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीने मजबुतीने सामोरे जाण्याची गरज बैठकीत व्यक्त झाली.
फडणवीस आणि भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील सद्यस्थितीबाबत यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय या चर्चेत होता, असे समजते.