केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार ४६ कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी खा. शरद पवारांनी मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केले होते.
नितीन गडकरींच्या कामगिरीचा उल्लेख करताना आलेला अनुभव देखील त्यांनी उपस्थितांना सांगितला. गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केलं. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवारांनी रस्त्यांचे देशाच्या विकासातील महत्व सांगितले. रस्त्याची वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी महत्त्वाची असते, असे सांगतानाच यात गडकरींचा मोलाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. ‘गडकरींनी ही जबाबदारी (रस्ते वाहतूक मंत्रालय) घेण्याच्या पूर्वी देशात ५ हजार किमीचं काम झालं होतं. गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे’, असेही शरद पवार म्हणाले.