स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं आहे.राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.
दरम्यान, सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांचं गेल्या चार दिवसांपासून घरातूनच अन्नत्याग आंदोलन सुरु होतं. तुपकरांची तब्येत ढासळत असल्यानं कार्यकर्त्यांची चिंता वाढू लागली होती. रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले होते. अन्नत्याग आंदोलनामुळे काल तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.