राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने एक एक मत महत्त्वाचं आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याने त्यांचं मत कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातच एमआयएमने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. परंतु महाविकास आघाडीला मत देताना त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्षाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय/वैचारिक मतभेद मात्र कायम राहतील.
धुळे आणि मालेगावमधील आमच्या आमदारांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी आम्ही काही अटी घातल्या आहेत. तसंच एमपीएससीमध्ये अल्पसंख्याक सदस्याची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणीही केली. याशिवाय मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी आम्ही केली. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितलं आहे. आम्ही त्यांना आमच्या शुभेच्छा देतो!