आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहिले होते. आमदार सरनाईक यांच्या लेटरबॉम्बने राजकारणात खळबळ उडाली होती. यावरुन भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला चांगलेच डिवचले होते. शिवसेनानेते संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे.
आम्ही वाघाच्या काळाजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचां अन् काळीज उंदराचं असं नाही. महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, अशा शब्दात शिसवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांच्यामुद्द्यावरून सुरु असलेल्या चर्चेसंदर्भात भाष्य करत विरोधकांचा सुद्धा चांगलाच समाचार घेत सरनाईक त्यांच्या पाठीशी शिवसेना भक्कम उभी असल्याचे विधान सुद्धा त्यांनी केले.
प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब त्रासात आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलंय. पण एक पक्ष म्हणून भूमिका घेण्याचे सर्व अधिकार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. आमच्यात कोणतीही गटबाजी वगैरे नाही. आमच्यात फक्त एकच गट आहे आणि तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गट. त्यामुळे राज्यात पाच वर्ष ठाकरे यांच्या नेतृत्वातच सरकार उत्तम काम करणार, कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी उत्तम समन्वयानं काम करत आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते.