कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी कोरोना रुग्णाच्या संख्येनुसार शिथिलता आणण्यात आली होती. मात्र अद्यापही सामान्य नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन ठरल्याचा अहवाल नुकताच समोर आला. पण नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?, असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.
दरम्यान, सरकारने आपसातली लफडी बाजूला ठेवावी, रुग्णसंख्या कमी झाली आहे. जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला. विषय आक्रमक हेण्याचा नाही, सरकारला परिणाम भोगावे लागणार, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचंय, अशी टीका देशपांडेंनी केली.