संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आज देशभरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्येच्या मृत्यूचे प्रमाणही मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
मात्र याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्ध असा सवाल विचारला आहे. पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. तसेच मोदी सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
चिदंबरम आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की “एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?” असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच “पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे 18 दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?” असं देखील चिदंबरम यांनी म्हणत निशाणा साधला आहे.