महाराष्ट्राचे राजकारण पवारांशिवाय पूर्णच होत नाही, कारण ते जन्मालाच राजकारण करण्यासाठी आले आहेत. परंतु थोडं समाजकारणही व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. राजकारणासह समाजकारण केले तर समाज ही त्यांचे आभार मानेल. शेवटी राजकारण हे समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी असते, आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी नाही. असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्यातील चौंडी येथे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार हजर होते. आज अहिल्यादेवींचे स्मरण करताना तुमच्या तरूण आमदाराने इथे उद्योग वाढावेत यासाठी इथे एमआयडीसी कशी होईल याकरता उद्योग मंत्र्यांसोबतही बैठका घेतल्या, जमिनीची निवड केली आणि या भागात एमआयडीसी येईल, कारखाने उभे राहतील याची पूर्ण तयारी याठिकाणी केली आहे. असे कौतुक त्यांनी रोहीत पवारांचे केले.
दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून सतत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात असतो. त्यात शरद पवार यांच्यावर सतत टीका केली जाते. सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक घेण्यात येणार आहे.