राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र आता लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला सर्व स्थरातून विरोध होताना दिसत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
राज्यातील नागरिक लॉकडाऊनला विरोध करण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ठाकरे सरकार आज कोणतीही मदत करायला तयार नाही. लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत आहे. गेल्या वर्षी जे जम्बो कोविड सेंटर सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनडीओंना चालवायला दिले, अशी टीकाही आंबेडकरांनी राज्य सरकावर केली होती.
आज लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक भरडले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल, असे आंबेडकर यांनी बोलून दाखविले आहे.