महाराष्ट्र दौ-यावर असणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्यावतीने त्यांची भेट घेणारे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी. हे एक कटकारस्थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे काल मुंबईत आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्यावतीने ही भेट आपण घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या भेटीबाबत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना या भेटीबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? असा सवालही आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, ममता दीदी यांचे महाराष्ट्रात सरकारी पक्षांनी स्वागत केले ते प्रथेप्रमाणे अपेक्षीतच आहे. पण त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्यांची झालेली बैठक कशासाठी होती? महाराष्ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्नेह असल्याचे सांगून या भेटी घेतल्या जातात. तुमचा कौटुंबिक स्नेह असेलही आम्हाला त्याबद्दल काय करायचे आहे पण महाराष्ट्राचा त्याच्याशी काय सबंध? बांग्लादेशीयांना संरक्षण देणा-या ममतादिदी यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध? असा सवालही त्यांनी केला.
ममतादिदी महाराष्ट्रातील उद्योगांना आपल्या राज्यात यायचे आमंत्रण देण्यासाठी आल्या आहेत. देशभर सर्वत्र उद्योग धंद्ये असले पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे. मात्र आपल्या राज्यातील उद्योग तुम्ही घेऊन जा, असे महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना दिदींना सांगते आहे काय? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज इथून घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय? महाराष्ट्रात कॉंग्रेसला ना स्थान, ना इज्जत, ना किंमत, ना स्थान, ना स्थिती त्यामुळे कॉंग्रेसला काय ते त्यांचे त्यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्ट्राचा आहे.
तसेच महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?
तसेच नुकतीच भिवंडीत बांग्लादेशींयावर कारवाई झाली अशा कारवाया पुन्हा करू नका म्हणून सत्ताधारी शिवसेनेने ममतादिदींना शब्द तर दिला नाही ना? पश्चिम बंगालमध्ये विरोधकांच्या ज्या हिंसा केल्या जात आहेत त्याचे धडे तर गिरवले जात नाही ना? असे प्रश्न उपस्थित करून आमदार अॅड आशिष शेलार यांनी या बैठकीचे अधिकृत माहिती आणि इतिवृत्त जाहीर करा, अशी मागणी केली आहे.