मुंबई | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज पालघरमधून सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान मोदी सरकारच्या कामाची माहिती राज्यातील तमाम जनतेला देण्यासाठी आणि ठाकरे सरकारच्या त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचे मंत्री भारती पवार यांनी माध्यमांना सांगितले होते.
भारती पवार यांची ही जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे जाणार आहे. केंद्रीय मंत्री म्हणून स्थानिक आरोग्यसुविधांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे हे पाहणं आपली जबाबदारी असल्याचं भारती पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
पुढे बोलताना लसी संदर्भात भाष्य करताना त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. आता पवार यांच्या या टीकेला आघाडीचे मंत्री काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.