मुंबई | ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी केलेल्या कारवाईत परप्रांतीय फेरीवाल्याने केलेल्या हल्यात अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे तुटली होती याच प्रकरणावर आजच्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता.
“पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.