देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात अनेक राज्यांमध्ये विशेष करून भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये कोरोना लसीचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज भारतीय जनता पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांसोबत केंद्र सरकार करोना काळात दुजाभाव करत आहे. आज विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या सहयोगी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा पत्र लिहून आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री मागत आहे. मात्र, केंद्र सरकारने मौन धारण केलं आहे. अनेक राज्यांमध्ये व्हॅक्सिन नाहीत, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही. गैर भाजपशासित राज्यांना मदत दिली जात नाही, मात्र भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना प्राधान्याने मदत केली जात आहे, असे सोनिया गाणी यांनी बोलून दाखविले होता.
आज रेमडेसिवीर रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असताना रेमडेसिवीर आणि मेडिकल ऑक्सिजनवर 12 टक्के जीएसटी का वसूल केला जात आहे? ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटरवरही 20 टक्के जीएसटी का वसूल केली जात आहे ? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच आपल्याच देशात हजारो लोक व्हॅक्सीन मिळत नसल्याने मरत आहेत. मात्र दुसऱ्या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा मोदी प्रयत्न करत आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती.