राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकासआघाडी सरकारवर घणाघाती टीका करताना दिसून येत आहे . त्यातच आता पुन्हा एकदा भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
या संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी आता वाटायला लागलय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच, मंत्रिमंडळातले मंत्री कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी करतात, स्वतः मुख्यमंत्री मेट्रोला झेंडा दाखवताना तुडुंब गर्दी झाली. मुख्यमंत्री फक्त सामान्य जनतेला धडे देतात पण जिथे मंत्र्यांची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्र्याची चालत नसल्याचंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनकडून वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा सामना करायचा असेल,तर सर्वांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक झालं आहे.