मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एक दिवसीय दौऱ्यावर भारतीय जनता पक्षासह आता मनसेने सुद्धा खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून १० किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका उद्वव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.