जळगाव | हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त तक्रारीनुसार जबाबदार विमा कंपनी व बँक शाखांनी ३० जून, २०२१ अखेर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांचे बँक खात्यांवर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. मात्र पाटील यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त तक्रारींबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विमा कंपनीचे प्रतिनिधींनी कृषि विभागांच्या जिल्हा व तालुका कार्यालयात थांबून ३० जून, २०२१ पर्यंत हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली होती.
या बैठकीत हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत आधार नंबर उपलब्ध न होणे/आधार कार्डावरील नाव अर्जावरील नावाशी न जुळणे, सर्व्हे नंबर अवैध असणे इ. कारणासाठी विमा हप्त्याची रक्कम ११२ शेतकऱ्यांना परत करणे. तसेच बॅकेव्दारे महसुल मंडळ/गाव/पिक चुकीचे नमुद केल्यामुळे विमा रक्कम न मिळणे, त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरली न गेल्याने अथवा चुकीची भरली गेल्याने त्यांना नुकसान भरपाईची रक्कम कमी अथवा मिळाली नाही. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडे दाखल केल्या होत्या. या तक्रार अर्जावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ठाकूर यांनी सांगितले.