राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून संप, आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप व महाविकास आघाडी सरकारमधील नेते टीका टिप्पणी करीत आहेत.दरम्यान आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा’ अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रात म्हंटले आहे की, आपल्याला माहित आहे की गेली ५ दिवस एसटी कर्मचा-यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत.
सुमारे ३५ पेक्षा जास्त एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केलीये त्यांची मुलं पोरकी झालीत पत्नी विधवा झाल्या आहेत.. ही जीवितहानी कशी भरून येणार..? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का…? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय.
दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्ताही आपण या प्रकरणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचा-याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा असे चित्रा वाघ यांनी पत्रात म्हंटले आहे.