भाजप आणि शिवसेना यांच्याकडून सातत्याने एकमेकांवर चिखलफेक केली जात आहेत. या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघत आहे. भाजप हिंदूत्ववादाच्या मुद्यावरून सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहे.
यातच आता भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला मोठे आव्हान दिले आहे. बाबरी मशीद पडली तेव्हा मी स्वतः आयोध्येत होतो. आम्हाला दुर्बिनीने शोधूनही तेथे एखादा शिवसैनिक दिसला नाही. जर एखादा शिवसैनिक तेथे होता, तर शिवसेनेने एखादा पुरावा दाखवावा, असे दानवे यांनी म्हटले आहे.
दानवे म्हणाले, “बाबरी मशीद पडली तेव्हा मी स्वतः आयोध्येत होतो. त्या ठिकाणावर होतो. दुर्बिनीने शोधूनही आम्हाला तेथे एखादा शिवसैनिक दिसला नाही. जर एखादा शिवसैनिक तेथे होता, तर त्याचा एखादा पुरावा यांनी (शिवसेनेने) दाखवावा, की तेथे कोणता शिवसैनिक होता. तेथे हे कुणीही आले नाही.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, मी स्वतः तेथे होतो, गोपिनाथराव मुंड तेथे होते आणि त्यावेळचे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. शिवसेना नव्हती. आता जे आम्ही केले, त्याचे श्रेय जर हे लाटत असतील, तर या देशातील जनतेला हे समजते, असे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.” ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.