पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय पटलावर अनेकवेळा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सतत टीका करताना दिसून आले आहे. मात्र आता दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी चक्क काँग्रेसच्या मुख्यामंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत, असं विधान पंतप्रधानांनी केलं आहे. गुरुवारी (ता. ३०) राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आभार मानत कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री गहलोत यांनी राज्यासाठीच्या विकासकामांची यादीच माझ्यासमोर ठेवली आहे. यामधून हे स्पष्ट दिसून येतं की, वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असूनही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. यासाठी मी अशोक गेहलोत यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री गहलोत हे माझ्याशी खुल्या मनाने बोलले. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, असं मोदी म्हणाले.
तसेच मोदींच्या या विधानानंतर गेहलोत देखील स्मितहास्य करताना दिसले. कोरोना महामारीने जगभरातील आरोग्य क्षेत्राबद्दल बरंच काही शिकवलं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देश आपापल्यापरिने या संकटाला समोरं जात आहे. दरम्यान, भारताने या काळात आपली शक्ती वाढवण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे.