पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर भाषण करत त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी नेत्यांना लोकांशी नाळ अधिक घट्ट करण्याचा सल्ला दिला आहे. “एखाद्या राजासारखे वागू नका. जमीनीशी नातं ठेवणारा नेता व्हा,” असा सल्ला मोदींनी नेत्यांना दिला आहे.
द प्रिंटने दिेलेल्या या वृत्तसमूहाने पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांना पक्ष कार्यकर्त्यांशी अहंकाराने वागू नये असा सल्ला दिला आहे. या कार्यकर्त्यांनीच तुम्हाला नेता बनवलं आहे याची आठवही मोदींनी सर्व भाजपा नेत्यांना करुन दिली आहे. तसेच सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू असल्याचेही मोदींनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी रविवारी भाजपाचे नेते, राज्यातील प्रभारी, अध्यक्ष आणि सचिवांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा उपस्थित होते. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी अनेक नेत्यांना आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे मत अनेक नेत्यांनी वक्त केले.
पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला तोंड देताना तेथील स्थानिक भाजपा नेतृत्व संवाद साधण्यात आणि आपलं म्हणणं मांडण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत असल्याने मोदींनी हा इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे.